फक्त बातमी न देता योग्य मार्गदर्शन करणारी पत्रकारितेची आज आवश्यकता - बी.के. सुर्या


अहमदनगर (प्रतिनिधी)- फक्त बातमी न देता योग्य मार्गदर्शन करणारी पत्रकारितेची आज आवश्यकता आहे. समाजावर वृत्तपत्रांचा प्रभाव आजही कायम असून, बातमी देताना त्यामधील भावना वाचकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. धावत्या जगात काम करताना पत्रकारांचा मानसिक ताण कमी होण्यासाठी ध्यानधारणा हा उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन आंतराष्ट्रीय किर्तीचे ध्यानधारणा प्रशिक्षक बी.के. सुर्या यांनी केले.

सीएसआरडी महाविद्यालयात शहर प्रेस क्लब व प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित माध्यमांमध्ये मुल्यांची आवश्यकता व तणावमुक्त माध्यम या मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी सुर्या बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार तथा मनोविज्ञान विशेषज्ञ बी.के. अनुज, मॉऊट आबू येथील ज्येष्ठ संपादक बी.के. गंगाधर, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, डॉ.दीपक हरके, बी.के. निर्मला, सीएसआरडीचे प्रशासकिय अधिकारी चिंतामणी नांदेडकर आदिंसह पत्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

पुढे बोलताना सुर्या म्हणाले की, समाजात मानसिक रोग झपाट्याने वाढत असून, मनातील नकारात्मक विचार याचे मुख्य कारण आहे. प्रत्येक कार्यासाठी मनात निर्माण होणारी भिती हे मानसिक रोगाचेच लक्षण आहे. मनाला सकारात्मक विचारांनी सशक्त बनवता येते. तणावदूर करण्यासाठी मनातील सकारात्म शक्ती जागृक करणे आवश्यक आहे. नकारात्मक विचाराने युवा वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात असून, निराशेने आत्महत्या करतानाही दिसत आहे. जीवनाचा आनंद लुटून उज्वल भविष्य घडविण्यासाठी ध्यानधारणेच्या माध्यमातून सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले. परिचय डॉ.दीपक हरके यांनी करुन दिला. यावेळी प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाचे बी.के. अनुज, बी.के. गंगाधर व बी.के. सुर्या यांचा 1 हजार 111 गुलाबपुष्पांच्या महाकाय बुकेंनी सत्कार करण्यात आला. याची वंडर बुक ऑफ रेकॉर्डस इंटरनॅशनल (लंडन) मध्ये वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद होणार आहे.

बी.के. गंगाधर म्हणाले की, दुसर्‍यांचे जीवन साकारण्याचे काम पत्रकार करत असतो. दुसर्‍यांना दिशा दाखविणार्‍या पत्रकारांच्या वाटेत अंधार नसेल, तर तो उत्तम मार्गदर्शक ठरु शकतो. ध्यानधारणेने जीवनात सुख, समृध्दी व यश प्राप्त करता येते. धकाधकीच्या जीवनात मनावर मनुष्याचे नियंत्रण नसून, मनाचे मनुष्यावर नियंत्रण असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

बी.के. अनुज यांनी मन, बुध्दी व शरीरावर नियंत्रणासाठी असलेले गुपित उलगडले. ते म्हणाले की, मनावर 
आर्थिक, सामाजिक, प्रतिष्ठा व आरोग्याचा प्रभाव होत असतो. मनुष्य स्वत:कडे लक्ष देत नाही. मनुष्याच्या जीवनात सुख, समृध्दी व यशासाठी अध्यात्मिक चेतना जागृत होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी स्वत:चा इंद्रीयांच्या सहाय्याने मनाच्या स्क्रीनवर ताबा मिळविण्यासाठी चित्र, कलर, संगीत व कलेचे थॉट्स उलगडून दाखविले. मनुष्याची बुध्दी व संगणकाची डिक्शनरी यांचा मेळ घालत लॅपटॉप, डेस्कटॉप पेक्षा जास्त शक्तीशाली असलेला हेडटॉपचा उलगडा केला. यशस्वी होण्यासाठी स्वत:च्या मनावर स्वत:चे थॉट्स कोरण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश देशपांडे महाराज यांनी केले. उपस्थितांचे आभार दत्ता इंगळे यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم