लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पत्रकारांचा चौथा स्तंभ महत्त्वाचा -जिल्हाधिकारी कवडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पत्रकारांचा चौथा स्तंभ महत्त्वाचा घटक आहे. सामाजिक व विकासात्मक कार्याबरोबर सद्गुण रुजविण्याचे कार्य पत्रकार करत आहे. सदृढ समाजरचनेसाठी सदाचाराचा प्रसार करण्याकरिता पत्रकारांची भुमिका महत्त्वाची ठरते. मतदान प्रक्रियेत नागरिकांचा अधिक सहभाग वाढविणे गरजेचे असून, मतदार नांवनोंदणी सारख्या अभियाना विषयी जनजागराणाची अपेक्षा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी व्यक्त केली.

पत्रकार दिना निमित्त तुषार गार्डन येथे आयोजित हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक पत्रकारिता पुरस्कार वितरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी कवडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले, महापौर सुरेखा कदम, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागीय सचिव मीनाताई मुनोत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, मा. जिल्हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब बर्‍हाटे, सामाजिक कार्यकर्ते भापकर गुरुजी, पोलिस उपअधिक्षक आनंद भोईटे आदि व्यासपिठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी कवडे म्हणाले की, भौतिक सुविधा महत्त्वाची नसून माणूस महत्त्वाचा आहे. माणसांचे मन बदलण्याचे काम माध्यमे करत असतात. बदलत्या काळात इलेक्ट्रॉनिक माध्यम व ई पेपरचा प्रभाव वाढत असल्याचे सांगून, पुरस्काररुपी नवरत्न निवडून पत्रकारांना प्रोत्साहन देण्याचे व विविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या प्रेस क्लबचे त्यांनी कौतुक केले.

बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रेस क्लबच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात विठ्ठल लांडगे यांनी देण्यात येणार्‍या पुरस्काराबद्दल माहिती देवून हाजी अजीजभाई यांच्या सामाजिक पत्रकारितेवर प्रकाश टाकला. तसेच प्रेस क्लबच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी केले.

हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक पत्रकारिता पुरस्कार सुदाम देशमुख, सुर्यकांत वरकड, अरुण नवथर, समीर दाणी, सुनिल चोभे, केदार भोपे, सागर शिंदे (शोध पत्रकारिता), राजू खरपुडे (वृत्त छायाचित्रकार पुरस्कार) व सागर दुस्सल (इलेक्ट्रॉनिक मिडीया) या नऊरत्न पत्रकारांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात यश मिळवणार्‍या पत्रकारांचा व प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध उपक्रम राबविणारे मन्सूरभाई यांचा सत्कार करण्यात आला. 75 वृत्तपत्रांची सजावट करुन सभागृहात आकर्षक रांगोळी रेखाटणारे डॉ.अमोल बागुल यांचा सत्कार करण्यात आला.
नागनाथ फटाले म्हणाले की, गतकाळातील व वर्तमान काळातील पत्रकारितेत अंतर आहे. वंचित घटकासाठी पाठबळ देणे, अन्यायाविरुध्द उभे रहाणे हीच सामाजिक पत्रकारिता होय. संवेदनशीलता, सकारात्मकता, सहानुभुती व जिज्ञासा ही फोरजी सामाजिक पत्रकारितेसाठी आवश्यक आहे. विविध बदल व विकासाच्या योजनांसाठी पत्रकारितेचे योगदान अमुल्य आहे. प्रेस क्लब ही विविध सामाजिक उपक्रमासह पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपक्रम राबविणारी आगळी वेगळी संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेंद्र टाक यांनी केले. उपस्थितांचे आभार सुशील थोरात यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post