जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, सध्याची टंचाई परिस्थिती पहाता जलयुक्त शिवार अभियान हे एक प्रकारे वरदान ठरणार आहे. या कामामध्ये प्रत्येकाने योगदान द्यायला हवे. अकोळनेरवासियांनी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामध्ये पत्रकारांचा थेट सहयोग हा सर्वांना प्रेरणादायी आहे. वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्याच्या माध्यमातून पत्रकार नेहमीच प्रगल्भतेने लोकप्रबोधन करीत असतात. न्याय-अन्याय व्यवस्थेच्या पटलावर मांडतांनाच समाजमन घडविण्याचे कामही पत्रकारिता करते. सामाजिक लोकोद्धाराच्या कामात सक्रिय सहभाग नोंदवून पत्रकारांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आगळी वेगळी आदरांजली अर्पण केल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानामुळे आगामी काळात फायदा होणार असून जलसंवर्धन, मृदसंधारण, पाण्याची बचत, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी पिके घेणे, ठीबक सिन्चनाचा वापर या गोष्टींचा अवलंब गावक-यांनी स्वयंस्फूर्तीने करावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कवडे यांनी गावक-यांनी लोकसहभागातून सुरु केलेल्या वाळुंबा नदीखोलीकरणाच्या कामाची पहाणी केली. या कामात अकोळनेरवासियांनी दिलेल्या योगदानाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर तेथेच आयोजित कार्यक्रमात प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. प्रास्ताविक महेश देशपांडे महाराज यांनी केले. यावेळी त्यांनी प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, तालुका पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले, माजी खासदार दादा पाटील शेळके यांनीही समयोचित मनोगत व्यक्त करतांना प्रेस क्लबच्या सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक केले.
गाव पाणीदार व शिवार हिरवेगार व्हावे म्हणून शासनाच्या सहयोगाने अकोळनेर वासियाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या या कामास नगर प्रेस क्लबच्या वतीने अकरा हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गावक-यांकडे सुपूर्द केला. शेवटी सागर शिन्दे यांनी आभार मानले.

Post a Comment